औरंगाबाद – ‘शेत मालाला हमीभाव अन् दारुमुक्त गाव’ या घोषणेसह संभाजी ब्रिगेड आगामी विधानसभा निवडणुकीत आपली ताकद आजमावणार आहे. त्याची पूर्वतयारी ब्रिगेडने आतापासून केली आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचा २६वा वर्धापन दिन औरंगाबादेत साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडने म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्या वंशजांना निमंत्रित केले आहे. संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील वादग्रस्त संघटना म्हणून ओळखली जाते, टिपू सुलतानच्या वंशजांना त्यांनी दिलेले निमंत्रणही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
टिपू सुलतानेच ७वे वंशज येणार औरंगाबादेत
विविध सामाजिक आणि लोकहिताच्या कार्यक्रमात आघाडीवर असणारी
संभाजी ब्रिगेडचा २६वा वर्धापन दिन ९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील गजाजन महाराज
मंदिराजवळील कडा ऑफिसच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची जाहिरातबाजी मोठ्या
प्रमाणात औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. ‘शेत मालाला
हमीभाव अन् दारुमुक्त गाव’ ही घोषणा या निमित्ताने संभाजी
ब्रिगेडने दिली आहे.
संभाजी ब्रिगेड आपल्या लोकोपयोगी कार्यापेक्षा वादग्रस्त
वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत राहिली आहे. गेल्या २५ वर्षांपासून संघटना महाराष्ट्रात
कार्यरत असून आता निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची संघटनेची तयारी असल्याचे
जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले. संभाजी
ब्रिगडच्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबादेत ‘स्वराज्य संकल्प मेळाव्या’चे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कडा
ऑफिसच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी म्हैसूरचे राजे हजरत टिपू सुलतान
यांचे ७वे वंशज शहजादे मन्सूर अलिशहा टिपू यांना
प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे असणार आहेत. तर महासचिव सौरव खेडेकर, गंगाधर बनबरे, प्राचार्य रेखाताई चव्हाण, डॉ. प.दे.राव, पप्पू भोयर, डॉ. सुदर्शन तारख, आनंद चांदे उपस्थित राहणार
असल्याचे शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणूक लढवणार
संभाजी ब्रिगेड २०१९ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण
ताकदीने उतणार आहे. संभाजी ब्रिगेडने अनेक प्रश्न आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून
सोडवले आहेत. मात्र काही प्रश्न राजकीय सत्तेशिवाय सुटू शकत नाहीत म्हणून संभाजी
ब्रिगेडने मागच्या ३ वर्षांपासून राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे, असेही
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी सांगितले. यावेळी ब्रिगेडचे
जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगर अध्यक्ष बाबासाहेब
दाभाडे, सचिव राहुल भोसले, संजय सोमवंशी, निलेश शेलार, रेणुका सोमवंशी, वैशाली खोपडे, रेखा वाहटूळे, रवींद्र वाहटूळे, विजय वाघमारे, अक्षय मेलगर, वैभव बोडखे, राम भगुरे, शिवाजी चव्हाण उपस्थित
होते








